मला शाळेमधली गणवेषाची पद्धत खरंच आवडते. समता, एकोपा अशा भावना त्यामुळे वाढीस लागतात. अमेरिकेतल्या शाळेत अशी गणवेष घालायची पद्धत नसली तरी इंग्लंडमधे गणवेष असतो. मात्र ही गणवेषाची परंपरा जपताना इंग्लिश लोकांनी बाकी अवडंबराला फाटा दिला आहे. भारतीय शाळांमध्ये मात्र दिवसेंदिवस शिस्त आणि सैनिकीकरण यांतला फरक समजून घेण्याचा अभाव दिसतो आहे. मुलांनी केस कापले आहेत का, मुलींनी दोन वेण्या घातल्या आहेत का याबाबत अतिशय काटेकोर असण्यात कसली आलीय शिस्त? पूर्वी बांगड्या घालणं, मेंदी लावणं या गोष्टींना फक्त कॉन्व्हेंट शाळांमध्येच (का कोणास ठाऊक) मनाई होती. आता हे लोण इतर शाळांमध्येही पसरत चाललं आहे. ज्या गोष्टी इथल्या संस्कृतीचा भाग आहेत, त्या करण्यात कसला आला आहे शिस्तभंग? बऱ्याच (शहरी) शाळांमध्ये आता मुलांना मारणं, छड्या देणं जरी बंद झालेलं असलं तरी मुलांचा पाणउतारा करणाऱ्या, त्यांना खजील करणाऱ्या शिक्षा सर्रास दिल्या जातात.
खरं तर शिस्त लावणं म्हणजे शिकवणं, शिक्षण देणं. खऱ्या शिस्तीचा मार्ग हा स्वयंशिस्तीकडे नेतो. लहान-सहान गोष्टींसाठी कठोर शिक्षा करून ते साध्य होणार नाही. शिक्षा टाळण्यासाठी तेवढ्यापुरता नियम पाळला जाईल, पण नियम, कायदे पाळण्याची मानसिकता यातून तयार होणार नाही. आपल्या समाजात किती लोकांना कायदे पाळण्यासाठी आहेत असं वाटतं? किती लोकांचा नियमाप्रमाणे काम करण्याबाबत कटाक्ष असतो? यातल्या बहुतेक लोकांना लहान असताना दरडावून, धमकावून, बळाचा वापर करून घरी आणि शाळेत नियम पाळायला लावले होते. शिक्षा होऊ नये म्हणून त्यांनी ते तेव्हा पाळलेही होते. पण त्यांना खरी शिस्त कधी लागलीच नाही. कारण खरी शिस्त आतून, पटली आहे म्हणून येत असते. आजच्या बहुसंख्य नागरिकांनी लहानपणापासून मारून-मुटकून गोष्टी केल्या, आपण पकडलो जाणार नाही ना, याचीच चिंता केली. सदसद्विवेकबुद्धीला प्रमाण मानून वागायचं शिक्षण मिळालं का?